मंगेश राजनकार
जळगाव जामोद दि.4:-
जळगाव जामोद तालुक्यातील निंभोरा बुद्रुक व खेर्डा खुर्द येथील शेत शिवारातील शेतकऱ्यांनी डीपी वर अतिरिक्त भार वाढल्याने वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून त्याबाबत येथील शेतकऱ्यांनी १४ सप्टेंबर २०२४ रोजी येथील शेत शिवारामध्ये नवीन विद्युत डीपी ची मागणी केली होती व ती मागणी मान्य ही झाली. तसेच डीपी कोठे बसवावी याचा सर्वे करण्यात आला तसेच येथील शेतकऱ्यांनी डीपी साठी जागाही उपलब्ध करून दिली. परंतु महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यांना डीपी बसविण्यासाठी वेळच भेटत नाही.हे शेतकरी वारंवार महावितरण कार्यालयामध्ये चकरा मारत असून यांना अधिकारी उडवाउडुची उत्तरे देत आहेत. येथील शेतकऱ्यांनी आता त्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात गहू हरभरा कांदा केळी संत्रा इत्यादी हंगामी व बारमाही पिके पेरलेली आहेत. डीपी ओव्हरलोड होत असल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होत आहे त्यामुळे शेतकरी आपल्या पिकांना पाणी पुरवू शकत नाही. त्यामुळे येथील ओलीते रखडली आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांनी जोपर्यंत महावितरण चे अधिकारी व कर्मचारी मंजुर झालेली डीपी बसवून देत नाही तोपर्यंत महावितरण कार्यालय जळगाव जामोद समोर उपोषणाचा मार्ग पत्करला आहे. निंबोरा बुद्रुक व खेर्डा खुर्द शेत शिवारातील शेतकऱ्यांनी आज दिनांक ०४ फेब्रुवारी २०२५ पासून अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे. या उपोषणामध्ये निंबोरा बुद्रुक व खेर्डा खुर्द येथील शेतकरी संतोष देशमुख, गणेश खंडारे, जंगलूमण दामोधर, सिद्धार्थ तायडे, शालिग्राम बहादरे, भास्कर खंडारे, ज्ञानेश्वर खंडारे, शेषराव मदनकार, धम्मपाल दामोधर यांच्यासह बहुसंख्य शेतकरी उपोषणास बसले आहेत.